राजगड, प्रतिनिधी : राजगड तालुक्यातील सिंगापूर-कुसारपेठ येथे विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत संबंधित शेतकऱ्यासोबत त्यांच्या गाईचाही मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंगापूर-कुसारपेठ येथील रहिवासी व शेतकरी विठ्ठल भागू ढेबे (वय ५५) हे सोमवारी आपल्या गाईंना चरण्यासाठी गावालगतच्या डोंगर परिसरात घेऊन गेले होते. यावेळी जवळच असलेल्या वीज खांबावरील तार अचानक तुटून एका गाईच्या अंगावर पडली. तार पडताच गाईला विजेचा जबरदस्त शॉक बसला. गाईला वाचविण्यासाठी विठ्ठल ढेबे यांनी धाव घेतली. मात्र, तारेला स्पर्श झाल्याने त्यांनाही विजेचा शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत गाईचाही मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत शेतकरी आणि गाय या दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ढेबे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वीज खांबावरील तार जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिनी मातीच्या इन्सुलेटरला तीव्र उन्हामुळे तडा गेला होता. त्यानंतर संबंधित इन्सुलेटर फुटल्याने वीज वाहिनीची तार तुटून खाली पडली आणि ही दुर्घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे उपअभियंता सचिन कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृत शेतकरी व जनावराच्या नुकसानभरपाईबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामीण भागातील वीज यंत्रणेची नियमित तपासणी व देखभाल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.










