भोर, प्रतिनिधी : भोर तालुक्यातील करंदी खेबा गावातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेमुळे गावाला शाश्वत जलस्रोत उपलब्ध झाला असून टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे विशेषतः महिलांची पाण्यासाठीची रोजची धावपळ थांबणार असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पुणे–सातारा महामार्गापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या करंदी खेबा गावासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. मात्र, योजनेतील सुमारे ३०० मीटर पाईपलाईन वन विभागाच्या हद्दीतून जाणार असल्याने आवश्यक परवानग्या मिळण्यात विलंब झाला. त्यामुळे ही योजना जवळपास दोन वर्षे रखडली आणि गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. परिणामी प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता.
त्यानंतर वन विभाग, जलसंपदा विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या समन्वयातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. देवडी येथील पाझर तलावातील पाझर विहिरीमधून सुमारे १,३०० मीटर लांबीच्या दाब नलिकेद्वारे करंदी खेबा गावातील विहिरीपर्यंत पाणी पोहोचविण्यात आले. चाचणी यशस्वी झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून गावाला वर्षभरासाठी शाश्वत पाणी उपलब्ध झाले आहे.
या योजनेमुळे शासनाचा टँकरवरील खर्च वाचणार असून नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी नियमित मिळणार आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट, वेळेचा अपव्यय आणि अतिरिक्त श्रम यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, जिल्हा प्रशासन, वन विभाग, जलसंपदा विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग यांनी संयुक्तपणे प्रयत्न केले. सरपंच नवनाथ गायकवाड, उपसरपंच कोमल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर होऊन योजना पूर्णत्वास गेली.
जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविण्याच्या शासनाच्या उद्दिष्टाला करंदी खेबा येथे यश मिळाले असून हा प्रकल्प परिसरातील इतर गावांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे.










