भोर : रात्रीची वेळ… डायल ११२ वर फोन येतो. समोरून आवाज येतो—‘माझं अपहरण झालंय… मला मारहाण केली जात आहे… माझ्या सुटकेसाठी रिंगरोड कंपनीने १७ लाख रुपये माझ्या बँक खात्यावर जमा करावेत!’ माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क होते. मात्र, तपास पुढे सरकताच या कथित अपहरणाच्या कहाणीमागचं वेगळंच वास्तव समोर आलं.
राहठवडे येथील लेबर कॅम्पमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ पोलिसांची धावपळ उडाली. मात्र, चौकशीत अपहरणाची माहितीच खोटी असल्याचे निष्पन्न झाले. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून पोलिसांना कारवाई करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाविरुद्ध राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राजेश वैजनाथ यादव (वय २५, सध्या राहठवडे लेबर कॅम्प, ता. हवेली; मूळ मध्य प्रदेश) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी अजय संजयसिंग चांदा यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.५५ वाजता यादवने डायल ११२ वर संपर्क साधला. काही इसमांनी आपले अपहरण केले असून, ते आपल्याला मारहाण करणार असल्याचे त्याने सांगितले. एवढेच नव्हे, तर रिंगरोड कंपनीने आपल्या बँक खात्यावर १७ लाख रुपये जमा करावेत, अन्यथा कंपनी जाळून टाकण्याची धमकी अपहरणकर्ते देत असल्याचेही त्याने सांगितले.
अपहरणासारखी गंभीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस यंत्रणा हालचालीला लागली. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती आणि चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीची पडताळणी केली असता कथित अपहरणाच्या दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या तपासात यादवने जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे आपत्कालीन हेल्पलाईनचा वापर करून पोलिस यंत्रणेला विनाकारण कारवाई करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.
या प्रकरणी ७ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.










