शिरवळ, ता. खंडाळा : शिरवळ परिसरात वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी शनिवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे आयोजित सभेत एकमुखी भूमिका घेत ड्रग्जविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला. गावातील वाढती व्यसनाधीनता, अल्पवयीन मुला-मुलींचा अमली पदार्थांकडे वाढता कल आणि त्यातून वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी शिरवळ बंद पाळत मूक मोर्चा काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स स्थापन करण्याचाही ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
सभेत उपस्थित नागरिकांनी मांडलेल्या माहितीनुसार, शिरवळ परिसरात सुमारे १०० जण अमली पदार्थांचे सेवन करत असून १५ ते २० जण विक्रीच्या साखळीत सक्रिय असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. विशेषतः अल्पवयीन मुलांचे प्रमाण वाढत असल्याने ही समस्या भविष्यात अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. काही वक्त्यांनी मुलींचाही या विळख्यात वाढता सहभाग असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
अमली पदार्थांच्या व्यवहारातून केवळ व्यसनच नव्हे, तर अवैध व्यवसाय, लैंगिक शोषणासारखे गंभीर प्रकार घडत असल्याचा आरोपही सभेत करण्यात आला. काही विशिष्ट ठिकाणांहून अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याची चर्चा नागरिकांनी केली. या सर्व प्रकारांमुळे शिरवळच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेला गालबोट लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
“तरुण टिकला तर गाव टिकेल, गाव टिकले तर देश टिकेल” हा संदेश देत व्यसनमुक्तीसाठी व्यापक जनजागृतीची गरज अधोरेखित करण्यात आली. शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधन कार्यक्रम, विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती, पत्रकांचे वितरण तसेच पालकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्याची भूमिका सभेत मांडण्यात आली. अल्पावधीत मोठे होण्याच्या मोहापायी अनेक तरुण चुकीच्या मार्गाला लागतात, त्यामुळे त्यांना योग्य दिशा देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सभेत काही वक्त्यांनी वाढत्या गुन्हेगारीसाठी तडीपार व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली. पोलिसांकडून कारवाया होत असल्या तरी मुख्य आरोपी आणि अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीपर्यंत पोहोचण्यात यंत्रणेला अपेक्षित यश मिळत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. पोलिसांवर जनतेचा दबाव कायम राहणे आवश्यक असून ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई झाल्यानंतरच त्यांचा सत्कार करू, अशी भूमिकाही काही ग्रामस्थांनी मांडली.
यावेळी दि. ७ जुलै २०२६ (मंगळवार) रोजी शिरवळ पोलिस ठाण्यावर मूक मोर्चा काढून निवेदन देण्याचा तसेच प्रशासनाच्या निषेधार्थ लाक्षणिक शिरवळ बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच नागरिक, युवक आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहभागातून अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असून ही समिती प्रशासनाशी समन्वय साधून व्यसनमुक्त शिरवळसाठी काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने, “व्यसनमुक्त शिरवळ घडविण्यासाठी आता प्रत्येक नागरिकाने पुढे येणे ही काळाची गरज आहे. गावाचे गावपण टिकवायचे असेल तर ड्रग्जविरोधातील लढा निर्णायकपणे लढावाच लागेल,” असा निर्धार व्यक्त केला.










