कापूरहोळ: भोंगवली पंचायत समिती गणात यंदाच्या निवडणुकीत परिवर्तनाचे वारे जोरात वाहू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश निगडे यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कार्यकुशलता, निष्ठा आणि आपुलकी हे त्यांच्या राजकीय कार्याचे ठळक वैशिष्ट्य ठरले असून, त्याच बळावर ते भोंगवली गणातील जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून गणेश निगडे यांनी पक्षाशी निष्ठावंत राहून संघटनात्मक काम करत तळागाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून ते गावकऱ्यांपर्यंत सर्वांशी आपुलकीने वागणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यंदा निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देत योग्य तो न्याय दिल्याची भावना पक्षातील कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
भोंगवली गणातील विविध गावांमध्ये होत असलेल्या भेटीगाठी, प्रचार दौऱ्यांमध्ये गणेश निगडे यांचे स्वागत मोठ्या उत्साहात होत आहे. “काम करणारा माणूस”, “सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता” अशी प्रतिक्रिया मतदारांकडून वारंवार ऐकायला मिळत आहे. युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी वर्ग यांचा त्यांना विशेष पाठिंबा लाभत असून, बदलाची अपेक्षा आता विश्वासात रूपांतरित होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या काळात प्रलंबित राहिलेल्या विकासकामांना गती देणे, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, शिक्षण व आरोग्य यांसारख्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “सत्ता नाही, सेवा” हा विचार घेऊन मैदानात उतरलेले गणेश निगडे हे परिवर्तनाचे खरे प्रतिनिधी असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.
यंदा भोंगवली गणात परिवर्तन घडणार, असा ठाम विश्वास अनेक मतदार व्यक्त करत असून, निष्ठावंत नेतृत्वाला संधी देण्यासाठी जनता सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला निर्णय आणि जनतेचा वाढता पाठिंबा पाहता, भोंगवली गणात यंदा नवे पर्व सुरू होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.














