भोर, प्रतिनिधी : वेनवडी परिसरात खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडून वनविभागाने सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, या कारवाईनंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागले असून तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. वनविभागाची ही कारवाई केवळ कायदेशीर होती की त्यामागे आर्थिक तडजोडीचा प्रयत्न होता, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खैर लाकडांची वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होण्यापूर्वी काही आर्थिक व्यवहाराची चर्चा सुरू होती, असा दावा काही स्तरांतून केला जात आहे. यामुळे कारवाईच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार, वन विभागातील एका कर्मचाऱ्याकडून दोन लाख रुपयांच्या आर्थिक मागणीचा विषय समोर येत असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, संबंधित संशयिताला मारहाण झाल्याचीही चर्चा तालुक्यात रंगली आहे. या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर कारवाईची संपूर्ण प्रक्रिया, पंचनामा, तसेच गुन्हा दाखल होण्यापूर्वी घडलेल्या घटनाक्रमाबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, आर्थिक मागणी व मारहाणीच्या चर्चांबाबत वनविभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे “वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न?” हा प्रश्न आता तालुक्यात चर्चेचा विषय ठरला असून या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(क्रमशः – भाग २ मध्ये : कारवाईनंतर नेमके काय घडले? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांना खतपाणी घालणाऱ्या घडामोडींचा आढावा.)










