सारोळे : भोर तालुक्यातील न्हावी गाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी नीरा नदीकाठी पाण्यातील मोटारींसाठी टाकण्यात आलेल्या कॉपर केबलवर डल्ला मारल्याची घटना सोमवारी (दि. २५ मे) सकाळी उघडकीस आली. या चोरीत तब्बल १ लाख ६ हजार ८०० रुपयांच्या १७८० मीटर कॉपर केबलची चोरी झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतीच्या कामांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत विकास रामचंद्र चव्हाण (रा. पेंजळवाडी, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते दि. २५ मे रोजी सकाळच्या दरम्यान ही चोरी झाली. न्हावी येथील नीरा नदीकाठी अनेक शेतकऱ्यांनी पाण्यातील मोटारी चालवण्यासाठी कॉपर केबल टाकल्या होत्या. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी या केबल कापून चोरून नेल्या. सकाळी शेतकरी मोटार सुरू करण्यासाठी नदीकाठी गेले असता ही बाब उघडकीस आली.
या चोरीत विकास चव्हाण यांच्या ३२० मीटर, हेमंत चव्हाण यांच्या २५० मीटर, मोहन चव्हाण यांच्या २०० मीटर, संजय सोनवणे यांच्या १८० मीटर, कुंदन सोनवणे यांच्या २८० मीटर, वैभव सोनवणे यांच्या २५० मीटर तसेच गोपाळ सोनवणे यांच्या ३०० मीटर कॉपर केबलची चोरी झाली आहे. एकूण १७८० मीटर केबल चोरीस गेल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सध्या शेतीसाठी पाण्याची गरज वाढलेली असताना मोटारींच्या केबल चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल कोल्हे करत आहेत.















