राजगड (वेल्हे) | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर गुरुवारी (दि. ५ जून) सायंकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात कोमल शिंदे (वय २१, रा. आळंदी, पुणे) या तरुण विवाहितेचा मृत्यू झाला. पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवरून उतरत असताना बालेकिल्ल्याच्या दुर्गम उतारावर त्या तोल जाऊन जवळपास ४०० फूट खोल दरीत कोसळल्या. या घटनेने गड-किल्ल्यांवरील पर्यटक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कोमल शिंदे या आपल्या पतीसोबत फिरण्यासाठी राजगडावर आल्या होत्या. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्या गडावरून खाली उतरत असताना, निसरड्या वाटेवरून तोल जाऊन थेट संजीवनी व सुवेळा माचीच्या मध्ये खोल दरीत कोसळल्या. कड्याच्या खडकांवर आपटल्याने त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. अपघात इतका भीषण होता की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते संकेत खरात आणि रामभाऊ ढेबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत खडतर मार्गाने मृतदेह खाली आणत राजसदरेच्या प्रांगणात पोहचवला. त्यांच्या तत्परतेमुळे रात्री उशिरा मृतदेह खाली आणण्यात यश आले.
गडावरील खाजगी संस्थेचे सुरक्षा रक्षक विशाल पिलावरे यांनी ही घटना प्रथम पाहिल्याची माहिती दिली. कोमल शिंदे चढताना पडल्या की उतरताना कोसळल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस ठाण्याचे अंमलदार पी.एच. सूर्यवंशी, पोलीस पाटील विश्वास शिर्के, पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे तसेच हवेली तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तानाजी भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वेल्हे पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार ज्ञानदीप धिवार यांनी सांगितले की, “सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास माहिती मिळाल्यावर रेस्क्यू पथक घटनास्थळी पाठवले गेले. रात्री उशिरा मृतदेह खाली आणण्यात आला.” सध्या वेल्हे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटा हे संभाव्य कारण मानले जात आहे.
या अपघातामुळे राजगडासारख्या ऐतिहासिक किल्ल्यांवर पर्यटकांसाठी आवश्यक सुरक्षाव्यवस्था नसल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा खडतर वाटांवर सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था नसल्याने जीवघेणे अपघात घडण्याची शक्यता वाढते. स्थानिक प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.