नसरापूर : राजगड पोलिस ठाण्याचे नवे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी पदभार स्वीकारताच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवैध धंदे, भाडेकरू पडताळणी, कामगारांची चारित्र्य पडताळणी, युवकांमधील व्यसनाधीनता आणि सायबर गुन्हे यांसारख्या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पोलिस निरीक्षक जाधव यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना थेट इशारा देत हातभट्टीची दारू, अवैध मद्यविक्री, गांजा आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना कोणतीही पाठीशी घातली जाणार नसून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कंपन्या, कारखाने आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांची चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित माहिती पोलिसांकडे सादर न करणाऱ्या व्यवस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात देणे आवश्यक असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले.
युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि गावपातळीवर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. युवकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना गुन्हेगारी व व्यसनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गुन्हे रोखण्यासाठी आणि तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रत्येक गावात व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मात्र यापूर्वीही अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नव्या पोलिस निरीक्षकांनी दिलेल्या इशाऱ्यांची आणि घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.










