नसरापूर प्रतिनिधी : भोर तालुक्यातील नसरापूर गावातील शिवगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याबाबत राजगड न्यूजने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अखेर नसरापूर ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले असून परिसरातील काही चिकन दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून शिवगंगा नदीच्या पुलाखाली व नदीकाठावर चिकन दुकानांमधून निर्माण होणारा कचरा, टाकाऊ पदार्थ आणि इतर घाण टाकली जात असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होत्या. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नदीचे प्रदूषण वाढत आहे. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा कचरा नदीपात्रात वाहून जाऊन पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
या संदर्भात राजगड न्यूजने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर नसरापूर ग्रामपंचायतीने संबंधित चिकन दुकानदारांना नोटिसा बजावत नदीपात्रात अथवा नदीकाठावर कचरा टाकण्यास तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटिशीत अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित दुकानदारांनी दुकान परिसरात स्वच्छता राखावी, व्यवसायामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय भविष्यात कोणताही दुकानदार नदीपात्रात किंवा नदीकाठावर कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर नियमानुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे. तसेच पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, राजगड न्यूजने उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर प्रशासनाने उचललेल्या या पावलाचे नागरिकांनी स्वागत केले असले तरी शिवगंगा नदीपात्रातील आधीच साचलेला कचरा तातडीने हटविणे, नियमित स्वच्छता मोहीम राबविणे आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.










