भुईमूग, सोयाबीन आणि भात काढणीसाठी पावसाची उघडीप आवश्यक
यावर्षी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून पाऊस उघडण्याचे नावच घेत नाहीये दररोज दिवसा ढगांच्या गडगडाटासह अवकाळी,तर रात्रीतही मुसळधार पाऊस कोसळत आहे. शेतीची पिके काढणी वाचुन चालली असल्याने शेतकऱ्यांनी आता ” जारे जारे पावसा, तुला देतो पैसा “अशी आर्त हाक पावसाला मारली आहे .
मागील काही दिवसापासून वारंवारच्या अवकाळी पावसाने राजरोसपणे हजेरी लावल्याने शेतकरी मात्र पावसाने मेटाकोटीला आला आहे. बऱ्याच लोकांचे अजूनही सोयाबीन काढणे वाचून वाया चालले असून तेच सोयाबीन खाचरात खराब होऊन जाण्याची भीती निर्माण झाली आहे. फुले प्रगती , एरंड्या जातीचे भुईमूग काढणीला आले आहेत. पावसाची उघडीप नसल्याने हेच भुईमूग शेतात पुन्हा उगवू लागले आहेत. काही ठिकाणी हळव्या जात्याची भात वाणे काढण्यासाठी आलेली आहेत यामध्ये रत्नागिरी चोवीस ,कोळंबा,रत्ना,शाहिनी,शान, पार्वती,रसिका अशी वेगवेगळ्या जातीची हळवी भाते काढणीसाठी आली आहेत. कधीतरी कडक उन पडत असुन या उन्हात शेतकरी शेतीच्या कामासाठी लगबगीला आला आहे. जादा वारंवारच्या होणा-या पावसाने भात उंचावले असुन आडवे पडले आहे. त्यामुळे आडवे झालेले भात झडुन जात आहे.तालुक्यात इंद्रायणी भाताचा सूवास जरी दरवळत असला तरी या भाताला उन्हाचीही आवश्यकता असुन पावसाने आता पुर्ण उघडिप घ्यावी असे शेतकरी सांगत आहे.
भात बियाणात रातडीचे मोठे प्रमाण, नामांकित कंपनीकडुन पुन्हा बोगस बियाणे
तालुक्यातील ब-याच शेतक-यांची भात पेरणी, भात लागवड चांगल्या प्रकारे होऊन भातेही टोट-यात दिमाखदारपणे आलीत परंतु भात बाहेर पडताना मात्र भात एकाच जातीचे नसल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले.भात खाचरातुन एक सारखे,एकाच जातीचे भात दिसत नाही . कमी जास्त उंचीचे रातडीचे , वेगवेगळ्या जातीचे भात दिसत आहे. ब-याच नामांकित कंपन्या मार्फत भात बियाणांची खरेदी शेतकऱ्यांनी केली. त्यावेळी दुकानातुन बियाणे देताना दुकानदार बियाणांची स्तुती करत एवढे उत्पन्न निघेल,एक नंबर कंपनीचे, एक नंबर बियाणे आहे हे घ्या असे सांगुन शेक-यांच्या माथी मारले. हे भात पाहून बी बीयाणे खराब,बोगस लागल्याचे शेतकरी दुकानदारास सांगताच दुकानदार मात्र अंगावर न घेता कानाडोळा करीत पुढच्या वेळी दुस-या कंपनीचे बी बीयाणे घ्या असे दरवर्षी सांगत आहे.
कृषी अधिकारी नावापुरते, ग्रामपंचायत कृषीबाबत शेतीच्या समस्यांबाबत स्तुत
तालुक्यातील ब-याच शेतक-यांना अजुनही तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांचे कार्यालय कोठे आहे ते माहीत नाही.कोणत्या गावाला कोणता कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, कृषी सेवक,कृषीमित्र आहे गावातील पदाधिकाऱ्यांनादेखील सांगता येत नाही.त्यांची कधी बदली होते, कोणता प्रभारी अधिकारी हे कधीच ग्रामस्तरावर माहीती गत नाही. त्यांची सुधारीत का नावे फोन नंबर ग्रामपंचायत कार्यालयात कधीच उपलब्ध नसतात,मग ते आपल्या शेतीच्या समस्या,बीयाणाबाबत तक्रारी कोणाकडे सांगणार असे अनेक शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. कृषी विभाग फक्त उपक्रमापुरता ,फोटो काढण्यासाठी गावात शेत-यांच्या बांधावर जात असुन या दरवर्षी बोगस बियाणांबाबत मूग गिळून गप्प आहे.