अतिवृष्टीमुळे सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी यांनी जारी केले आदेश
सध्या राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असून अतिवृष्टीमुळे घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पुणेहून भोर वरंधा घाट मार्गे महाडला कोकणात जाणारा जवळचा रस्ता भोर – महाड मार्गावरील वरंधा घाट प्रशासनाने तीन महिन्यांसाठी अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवार दि.१६ पासून वरंधा घाटातून वाहतूक बंद करण्यात आल्याचा आदेश पुणे जिल्हाधिकार्यांनी जारी केला आहे. सदरचा हा रस्ता दि.१२-०६-२०२५ ते ३०-०९-२०२५ पर्यंत बंद रहाणार आहे.वरंधा घाटातून महाडला जाणाऱ्या- येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते.सध्या घाट रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून रस्ता चिखलमय झाला आहे.घसरट्या निसरड्या रस्त्यावरून वाहनांची ये – जा सुरू असून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत असल्याने दरडी कोसळण्याचे प्रकार घडू शकतात. संभाव्य दरड कोसळण्याचे धोके टाळण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीत जिवीत हानी टाळण्यासाठी सदरचा हा घाट बंद केला आहे. यामुळे अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर हवामान खात्याने रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी केल्यास घाटातून हलक्या वाहनांचीहीदेखील वाहतूक बंद करण्यात येईल. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
