भोर : पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून येत्या रविवारी ते भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश होणार आहे.
संग्राम थोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांच्या वडिलांनी – अनंतराव थोपटे यांनी – भोर मतदारसंघातून तब्बल सहा वेळा आमदारकी भूषवली होती.
नुकत्याच निवडणुकीतील पराभव आणि बदलते समीकरण
अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी केला होता. त्यानंतर संग्राम थोपटे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेस राजीनामा अद्याप नाही
संग्राम थोपटे यांनी अधिकृतरीत्या काँग्रेसला राजीनामा दिलेला नाही. मात्र, ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत असून रविवारी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
राजगड साखर कारखान्याचा मुद्दा केंद्रस्थानी
थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. राज्य सरकारने कारखान्यासाठी 80 कोटी रुपयांचे मार्जिन मनी मंजूर केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिल्यामुळे आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यामुळे, अजित पवारांच्या विरोधामुळे ही मदत मागे घेण्यात आली. त्यामुळे आता कारखान्याला मदत मिळवण्यासाठी थोपटे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची जोरदार चर्चा आहे.
थोपटे आणि पवार यांच्यातील जुना वाद
भोरच्या थोपटे कुटुंबीयांचा आणि बारामतीच्या पवार कुटुंबाचा राजकीय वाद अनेक दशकांपासून सुरू होता. अनंतराव थोपटे यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असताना शरद पवारांनी त्यांना रोखल्याचा दावा त्याकाळी केला जात होता. यानंतर अनंतराव थोपटे हे राजकारणात मागे पडले होते.
लोकसभा निवडणुकीत मैत्रीचा हात
अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं केल्यावर, पवार कुटुंबीयांनी थोपटे कुटुंबीयांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आणि 40 वर्षांपासून चालत आलेला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परिणामी सुप्रिया सुळे यांना भोरमध्ये मोठं मताधिक्य मिळालं.
मात्र आता पुन्हा एकदा थोपटे आणि पवार कुटुंबीयांमध्ये राजकीय अंतर वाढताना दिसत आहे. संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश भविष्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतो.