भोर : पंचायत समितीतील विकास निधीच्या वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. भाजपचे सदस्य रोहन बाठे, सुषमा चव्हाण, गीता आंबवले आणि माऊली पांगारे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या सभापतींसह सत्ताधारी सदस्यांवर निधी वाटपात पक्षपातीपणा केल्याचा गंभीर आरोप केला.
भाजप सदस्यांनी सांगितले की, सन 2022 ते 2026 या कालावधीत पंचायत समितीला ₹5 कोटी 10 लाख 51 हजार इतका विकास निधी उपलब्ध झाला. निधी नियोजनासाठी सभापतींनी विशेष सभा बोलावून सदस्यांकडून कामांची यादी मागविली होती. त्यावेळी प्रत्येक सदस्याने ₹15 लाखांच्या कामांची शिफारस करावी, असे सांगण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्ष निधी वाटप करताना वेगळेच चित्र दिसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वाट्याला सुमारे ₹65 लाखांचा निधी येणे अपेक्षित असताना प्रत्येकी केवळ ₹20 लाखांची कामे मंजूर करण्यात आली. उर्वरित निधीचे वाटप सत्ताधारी सदस्यांच्या सोयीनुसार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
“सभापती नेमके कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, हे समजत नाही. वेळेचे नियोजन पाळले जात नाही. आम्हाला विश्वासात न घेता निधीचे वाटप करण्यात आले असून आमच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे. अधिकाराबरोबर जबाबदारीही सभापतींचीच आहे. या प्रकरणी न्यायालयात जाण्याचाही आम्ही विचार करत आहोत,” असे भाजप सदस्यांनी स्पष्ट केले.
या निधीतून १२८ विकासकामांचा समावेश करण्यात आला असून, ₹१५ हजारांपासून ₹१० लाखांपर्यंत खर्चाच्या गटारे, रस्ते, वॉटर फिल्टर, सामाजिक सभागृहे, सौरदिवे आणि परिसर सुशोभीकरण यांसारख्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
दरम्यान, भाजप सदस्यांनी केलेल्या आरोपांमुळे पंचायत समितीतील राष्ट्रवादी-भाजप वाद आणखी तीव्र झाला असून, या आरोपांवर सभापती आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांची भूमिका काय असणार, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.










