लग्न , वरात, साखरपुडा,पूजा,जागरण गोंधळ, वास्तुशांती कार्यक्रमांचे अवकाळीच्या पावसाने मोठे नुकसान, शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान भुईमूग पिक पुन्हा ऊगवुन भुईसपाट
मागील चार दिवसांपासुन सर्वत्र अवकाळीच्या पावसाने मोठे थैमान घातले असून भोर तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे . सध्या चार दिवसापासून सर्वत्र ढगाळ वातावरण होत असून पावसाची रिमझिम,रीपरीप सुरू आहे. दोन दिवस झाले तालुक्यात लगीनसराई , लग्नाची मोठी तिथी आहे . सायंकाळी होत असलेल्या अवकाळी पावसामुळे वऱ्हाडी मंडळींचे मोठे हाल होताना दिसत आहेत तर कित्येक वऱ्हाडी मंडळीं वर वधूं सह मंडपात अडकून उशिरापर्यंत राहत आहेत . रस्त्यांवरील पाण्याची तळी, खड्डे प्रशासनाची नियोजन शून्य कामे पहायला मिळत आहेत. रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागताना दिसत आहे. त्यामुळे प्रवासी नागरिक, वाहतूकदार, वाहनचालक प्रशासनावर वैतागून गेले आहेत. जनावरांचा चारा भिजुन गेला आहे.तर शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील शेवटचे महत्त्वाचे भुईमूग पीक काढणी वाचून वाया चालले आहे काय ठिकाणी तर भुईमूग पुन्हा ऊगवुन शेंगांना कोंब फुटले आहेत. आंब्याच्या झाडांला पावसाने झोडपल्याने आंबे गळुन मोठे नुकसान झाले आहे . लग्न , वरात,हळद, मेहंदी, पूजा, साखरपुडा, वास्तुशांती,जागरण गोंधळ,परडी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमांना अवकाळीच्या पावसाचा तडाखा बसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक वैतागून गेले आहेत. ग्रामीण भागातून तर बहुतांश गावातुन घरकुलाची ,घर दुरुस्तीची कामे चालू आहेत त्या घरातुन पाणी साचले आहे. कित्येकांची बांधकाम रेती वाहुन गेली आहे तर सिमेंट भिजले आहे. एसटी बसेस बंद पडत आहेत.त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे.यावर्षी में महिन्यात पहिल्यांदा असा मुसळधार अवकाळी पाऊस बरसत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.