भोर – कापूरहोळ -वाई-सुरुर या रस्त्याच्या कामासाठी रस्त्यालगत अडथळा ठरणाऱ्या हजारो वृक्षांची वृक्षतोड संबंधित प्रशासनाकडुन करण्यात आली होती. सदर वृक्षतोड झालेल्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तिपटीने वृक्ष लागवड करण्याचे सांगितले होते परंतु सदर वृक्ष लागवड झाली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पर्यावरण मित्रांनी त्याबाबतचे लेखी निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग यांच्याकडे दिले होते संबंधित निवेदनात आपण किती वृक्ष लागवड केली आहे,त्या वृक्षांची संख्या,लागवड केलेले ठिकाणे, त्यातले किती वृक्ष आतापर्यंत जगली आहेत, वृक्षांच्या जाती, अशा प्रकारची माहिती मागवली होती परंतु ती माहिती संबंधित वेळेत प्राप्त न झाल्यामुळे अडथळा ठरत नसलेली वृक्ष देखील राजरोसपणे तोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर भोरमधील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी साष्टांग प्रणाम आंदोलन भाटघर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर मंगळवार (दि.१२) रोजी केले. यावेळी पर्यावरण मित्र तबरेज खान, सचिन देशमुख, धिरज भोंडवे, राजेंद्र गुरव, विजय रोमण,विशाल शिंदे, उमेश मोरे, सचिन सावंत, सुनील सावंत, अनिरुद्ध बर्वे, रोहित नलावडे, मनोज क्षीरसागर,चंद्रकांत मळेकर ,यश शेलार, प्रशांत राजेशिर्के आंदोलनकर्ते उपस्थित होते. सदर आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.पोलिस प्रशासनाकडूनही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सदर केलेले आंदोलन हे कापुरव्होळ भोर रस्त्याच्या दुतर्फा परवानगीने तोडलेल्या झाडांच्या बदल्यात तिप्पट झाडे लावणेबाबत आहे.सदर तिप्पट झाडे लावणेबाबत मा कार्यकारी अभियंता सा.बा. (द) पुणे यांनी वृक्ष तोड परवानगी देताना बंधपत्र लिहुन दिले होते. त्यान्वये त्यांनी सदर तिप्पट वृक्ष लागवड केल्याबाबतचा अहवाल सादर करणेबाबत त्यांना कळविले आहे. सदर तिप्पट झाडे लावणेबाबत संबंधीत यंत्रणेकडे या कार्यालयाकडुन पत्र व्यवहार करुन पाठपुरावा करण्यात येत आहे. संबंधीत यंत्रणेकडुन याबाबत माहिती घेवुन झालेल्या कार्यवाहीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपणास त्याबद्दल माहिती देण्यात येईल. तसेच संबंधीत यंत्रणेने सदर तिप्पट वृक्ष लागवड न केल्यास संबंधीतांवर उचित कारवाई करण्यात येईल.तसेच वृक्ष तोड परवानगीची मुदत संपल्यानंतर तोडलेल्या व वाहतुक केलेल्या वृक्षांबाबत संबंधीत यंत्रणा व कंत्राटदार यांचेवर पुढील १० दिवसात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी आपले आंदोलन मागे घेण्यात यावे असे लेखी आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.