जेजुरी: विजयकुमार हरिश्चंद्रे
विजयदशमी हा भारतभर साजरा होणारा लोकप्रिय सण असून या सणात शस्त्र पूजनाला फार महत्व दिले जाते. जेजुरीच्या खंडोबा गडावरील जगप्रसिद्ध असलेला महाखंडा ही तीनशे वर्षांपूर्वीची इतिहास कालीन तलवार आहे. त्यास खंडा या नावाने संबोधले जाते. या खंडाचे वजन तब्बल ४२ किलो आहे. यामुळे यास धार्मिक ऐतिहासिक महत्व प्राप्त असून देखील केवळ देवसंस्थान विश्वस्थानच्या मनमानी आणि अहंकारी भूमिकेमुळे सदर तलवार चक्क पत्र्याच्या पेटीत ठेऊन इतिहासाच्या शस्त्र, शास्त्र नितीचा अवमान केला असल्याची खंत मा. ट्रस्टी संदिपआप्पा जगताप, मल्हाराजे प्रतिष्ठान, समस्त ग्रामस्थ खान्देकरी मानकरी, गावकरी, रंभाई शिंपीन ट्रस्ट धालेवाडी आणि खंडा बहाद्दरांनी व्यक्त केली आहे.
शस्त्राचा अवमान केल्याची खंत
मंदिराच्या लोक परंपरा संस्कृती याबद्दल सध्याच्या विश्वस्त कमिटीचे अज्ञान आणि राजकीय हितसंबधातून जेजुरी गडावर निवडून आलेले विश्वस्त मनमानी कारभारतून गडावर मागील ट्रस्टींनी या महाखंडाचे धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्व पाहता उपलब्ध करून ठेवलेल्या मेघडंबरीत ही तलावर न ठेवता पत्र्याच्या पेटीतून ठेवून एक प्रकारे भारतीय शस्त्राचा अवमान करीत असल्याचे उघड झाले आहे.
खंडा पाहण्यासाठी विदेशी पर्यटक गडावर होतात दाखल
वास्तविक जेजुरी गडावरील हे ऐतिहासिक शस्त्र पाहण्याकरिता मॉरीशेष, रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि इंग्लंड व इतर प्रदेशातून विदेशी पर्यटक येथे येत असतात. परंतु, भाषा न समजल्याने अथवा ट्रस्टींकडून याबतचे फलक नसल्याने त्यांना इतिहास ज्ञात होत नाही. याकरिता हिंदी, इंग्रजी, मराठी आणि इतर प्रादेशिक भाषेत या शस्त्राची माहिती फलक लावणे आवश्यक असल्याचे नागरिक पर्यटक भविकांचे म्हणणे आहे.
खंडा शस्त्रावर लघुपटाची निर्मिती
विशेषतः विजयादशमीला भारतीय शस्त्र आणि खंडोबा देवाचा नवसाला आलेला खंडा महत्वाचा असल्यामुळे या खंडा शस्त्राची विशेष पूजा करून चित्तथरारक कसरती करण्याची प्रथा आहे. यामध्ये कसरती आणि तोलून धरण्याच्या स्पर्धेमधून पारितोषिके दिले जातात. याबाबत जर्मनी हेंडलबर्ग युनिव्हरसिटीचे इतिहास अभ्यासक कै. डॉ. गुंठुर सोन्थ्यमार यांनी या तलवारीवर चाळीस वर्षापूर्वीं लघुपट देखील प्रसारित केला होता.
ट्रस्टींकडून जाणीवपूर्वक केले जातेय दुर्लक्ष?
या सर्व बाबी पाहता अनेक वेळा ट्रस्ट कमिटी जी ‘सेल्फी’ आणि ‘स्व:जाहिरातीत’ मग्न असते. ती या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या विश्वस्त व्हिआयपी आणि राजकीय व्यक्तींच्या खंडोबा दर्शन व्यवस्थेमध्ये मशगुल असून, मंदिराचा सांस्कृतिक विकास त्याचे सामाजिक धार्मिक महत्व, भाविक पर्यटक, सोय सुविधा, मंदिराच्या ग्राम विकासाकडे परंपरेकडे दुर्लक्ष करून व्हीआयपी आणि अधिकाऱ्यांच्या मर्जी सांभाळण्यात धन्यता मानत आहेत.
अनमोल ठेवा दुर्लक्षित होतोय?
सदर खंडा 1763 ते 1766 च्या दरम्यान पुरंदरच्या ऐतिहासिक पानसे सरदार घराण्याने नवस पूर्ती म्हणून अर्पित केल्याचा इतिहास सांगितला जातो. अशा धार्मिक आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या इतिहासिक शस्त्राला पत्र्याचे पेटीत ठेऊन ट्रस्ट नेमके काय साधते करु पाहते? हे समजू शकत नाही. याबाबात स्थानिक नागरिकांसह शासन धर्मदाय आयुक्तांनी लक्ष न दिल्यास महत्वपूर्ण ऐतिहासिक अनमोल असा ठेवा पत्र्यातून नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.