खेड शिवापूर : हवेली तालुक्यातील आर्वी येथे घरगुती वादातून विवाहितेची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पतीविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुतुजा अक्षय तावरे (वय २५, रा. आर्वी, ता. हवेली) असे मृत विवाहितेचे नाव असून, अक्षय रामदास तावरे (वय २८, व्यवसाय सलून, रा. आर्वी, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत रुतुजा तावरे हिचा भाऊ अनिकेत दादासो पवार (वय २६, व्यवसाय सलून, रा. पणदरे, ता. बारामती) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १७ जून २०२६ रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास आर्वी येथील राहत्या घरी पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपी अक्षय तावरे याने पत्नीला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून ठार मारल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
घटनेची माहिती मिळताच भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गौर, प्रभारी पोलीस निरीक्षक जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे आर्वी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, परिसरात शोककळा पसरली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.










