नसरापूर: न्हावी ३२२ (ता. भोर) ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच गणेश ज्ञानोबा सोनवणे यांना कर्तव्यात कसूर करून सरपंच पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात आले आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडावार यांनी याबाबतचे आदेश पारित केले आहेत.
ग्रामपंचायत सदस्य आणि प्रहार जनशक्ती पक्ष, भोर तालुका उपाध्यक्ष अजय रुपचंद कांबळे यांनी सोनवणे यांच्यावर १५ वा वित्त आयोगाचा निधी बेकायदेशीरपणे खर्च करणे, मासिक सभा न घेणे, मनमानी कारभार करणे, रजिस्टरमध्ये खाडाखोड करणे, शासकीय प्लॉट बेकायदेशीरपणे विकणे, बनावट मृत्यू दाखले तयार करणे आणि भ्रष्टाचार करणे अशा अनेक आरोपांवर तक्रार दाखल केली होती.या तक्रारींची चौकशी गटविकास अधिकारी (पंचायत समिती भोर) यांनी केली आणि अनेक चौकशी अहवाल पुणे विभागीय आयुक्तांकडे सादर केले. या अहवालांच्या आधारे डॉ. पुलकुंडावार यांनी सोनवणे यांनी कर्तव्यभंग केल्याचा निष्कर्ष काढला आणि त्यांना ग्रामपंचायतीचे सदस्य पदावरूनही पदमुक्त करण्याचे आदेश दिले.याबाबत कापूरहोळ (ता. भोर) येथील राजवाडा हॉटेल येथील आयोजित पत्रकार परिषदेत तक्रार अर्जदार ज्ञानेश्वर उर्फ अजय रुपचंद कांबळे (रा. न्हावी ३२२, ता. भोर, जि. पुणे) यांनी यावेळी सर्व गोष्टींचा खुलासा केला. याप्रसंगी रमेश गणगे (बळीराजा शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष), संतोष मोहिते(मा. अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, भोर तालुका), संतोष पारठे, गणपत पारठे, मिलिंद तारु, जगवाय सपकाळ, विजय गायकवाड, लव्हाजी मालुसरे, रामचंद्र कोढाळकर, बाळासाहेब पवार तसेच आदी उपस्थित होते.