खेड शिवापूर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील खेड शिवापूर व कापूरहोळ पट्ट्यातील काही दारू विक्री केंद्रांजवळ वाढती गर्दी आणि मद्यपींचे निष्काळजी वर्तन सध्या अपघातांचे कारण ठरत आहे. हे मद्यपी थेट मुख्य मार्गावर किंवा सेवा रस्त्यावर वाहने उभी करून दारू खरेदी करत असून, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. परिणामी, अपघाताचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
सायंकाळी, विशेषतः कार्यालय सुटण्याच्या वेळेत, या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण अधिक असते. अनेकदा या दुकानांसमोरच दुचाकी, चारचाकी तसेच ट्रक उभे करून मद्यपी रस्त्यावरच थांबतात. यामुळे इतर वाहनचालकांची वाहतूक खोळंबते आणि अपघाताची शक्यता वाढते.
महत्वाचे म्हणजे, नागरिक आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते वारंवार तक्रारी करत असतानाही महामार्ग पोलीस किंवा राजगड वाहतूक विभागाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही. सीसीटीव्हीची अनुपस्थिती आणि ‘नो पार्किंग’ झोन नसल्यानं या नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई टळते आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की, या दारू दुकानांसमोर नो पार्किंग झोन घोषित करावा, सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी. अपघात घडल्यास जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाईही केली जावी, अशी मागणी केली जात आहे.
“रस्त्यावरच वाहन उभे करून इतरांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे,” असा संतप्त सूर स्थानिक नागरिकांमधून उमटतो आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वाहतूक यंत्रणांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.
वाहतूक कोंडी काढण्याऐवजी महामार्ग पोलिस वसुलीत दंग! नागरिकांचा आरोप
पुणे-सातारा महामार्गावर वाढलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय करण्याऐवजी महामार्ग पोलिस वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अपघातप्रवण भागात नियंत्रणाऐवजी दंड वसूल करण्यावर भर दिला जात आहे, त्यामुळे स्थानिकांत नाराजीचा सूर आहे.