भोर : गोगलवाडी येथील ग्रामस्थांनी गावातील तीन प्रमुख वहीवाटीचे रस्ते काही शेतकऱ्यांकडून बंद करण्यात आल्याच्या विरोधात 6 मे पासून उपोषण सुरु केले आहे. सदर रस्ते पूर्वीपासून सार्वजनिक वापरात असून त्याबाबत पूर्वी दिलेले तीन वेगवेगळे निर्णय रस्ते खुल्या ठेवण्याचेच आहेत. मात्र अलीकडे हवेली प्रांताधिकाऱ्यांनी याच प्रकरणात रस्ता बंद करणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने निर्णय दिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाला संशयित ठरवले असून त्याची चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे. “आमच्या मागण्या सरकार दरबारी वारंवार मांडल्या असून केवळ आश्वासनाशिवाय काहीच ठोस कृती झालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाची रोजच्या शेतीकामांमध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे. रस्ते बंद असल्यामुळे शेतीमाल वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग नाहीत, परिणामी आर्थिक नुकसानही होत आहे,” असे मत ग्रामस्थांनी मांडले.
या संदर्भात माजी सरपंच अशोक गोगावले यांनी सांगितले की, “शुक्रवारपर्यंत शासनाने रस्ते खुल्या करण्याबाबत ठोस निर्णय अथवा खात्रीशीर आश्वासन द्यावे. अन्यथा आम्ही गावाचा मुख्य रस्ता बंद करून आमरण उपोषण करण्यास भाग पडू.”
ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि गावकरी या आंदोलनात सहभागी असून त्यांच्या या लढ्यात महिलांचाही मोठा सहभाग आहे. दरम्यान, प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने गावात असंतोषाचे वातावरण आहे.
सदर प्रकरणात शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. अन्यथा गोगलवाडीतील आंदोलन अधिक तीव्र होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.