भोर (ता. भोर) : भोर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी व नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपुष्टात येत आज (३ ऑगस्ट) न्हावी गावात पहिल्यांदाच आठवडे बाजार सुरू झाला. स्थानिक शेतमाल व दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या विक्रीसाठी दर रविवारी भरविण्यात येणाऱ्या या बाजारामुळे परिसरातील शेतकरी व ग्राहकांना मोठी सोय होणार आहे.
सदर बाजार हा श्री यमाईमाता मंदिराच्या प्रांगणात भरविण्यात आला असून, त्याचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्रभाऊ जगताप यांच्या हस्ते झाले. या वेळी न्हावी ३२२ चे सरपंच सौ. शितलताई सोनवणे यांचे पती सुरेशआप्पा सोनवणे, न्हावी १५ चे सरपंच भरतआण्णा सोनवणे व पांडुरंग सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमास भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, राजगडचे माजी संचालक रविदादा सोनवणे, विद्यमान संचालक दत्तात्रय चव्हाण, न्हावी विकास सोसायटीचे चेअरमन अंकुशअण्णा चव्हाण, न्हावी FPO चे चेअरमन नवनाथ सोनवणे यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
आतापर्यंत न्हावी ३२२, न्हावी १५, राजापूर, भोंगवली, भांबवडे, पेंजळवाडी, गुणंद, वाठार हिंगे, टापरेवाडी या गावातील शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी वाठार कॉलनी, विर, किकवी, शिरवळ व भोर येथे नेत होते. स्थानिक बाजार नसल्याने शेतकरी व ग्राहक दोघांनाही त्रास सहन करावा लागत होता.
नव्या आठवडे बाजारामुळे शेतकऱ्यांना गावातच शेतमाल विक्रीची संधी मिळणार असून नागरिकांना ताजा व स्वच्छ भाजीपाला सहज उपलब्ध होईल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासह आर्थिक उन्नती साधली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भविष्यात राष्ट्रीय सहकार विकास विभागाच्या (NCDC) मदतीने या मंडईला अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे भालचंद्रभाऊ जगताप यांनी सांगितले.