पाण्याच्या टाक्या लवकरात लवकर स्वच्छ करण्याची नागरिकांची मागणी
भोर तालुक्यातील चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बारे बुद्रुक (ता.भोर) गावातील गवंडीआळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत मेलेला साप आढळून आल्याचे तेथील स्थानिक रहिवासी नागरिकांकडुन सांगण्यात आले. नागरिकांना पाण्याचा वास येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्वरित तेथील नागरिकांनी पाण्याच्या टाकीचे पाईपलाईन खोलली असता मेलेल्या सापाचे अवशेष त्या पाण्यातून आढळले त्यामुळे बारे बुद्रुक येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मागील वर्षीही मार्च महिन्यात दुषित पाण्याने , साथीच्या रोगाने येथील खूप लोक आजारी पडले होती. प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून त्यावेळी नागरिकांची तपासणीदेखील करण्यात आली होती. त्यावेळीही नागरिकांनी पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या जात नाहीत असे सांगितले होते. आज गुरुवार (दि.२४) सकाळपासून पाण्याचा उग्र वास येत आहे असे जाणवले असता तेथील नागरिक कुंडलिक साळेकर, सुनील दानवले, संतोष दानवले , शंकर दानवले, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय दानवले यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन पाण्याच्या टाकीत काहीतरी असल्याचे बघितले नंतर पाण्याच्या टाकीचा मोठा पाईप खोलून सदर पाण्यातून सापाचे अवशेष त्यांना आढळून आले. सदर पाण्याची टाकी साफ केली होती नागरिकांनी घाबरून न जाता सदर टाकीचे भरलेले पाणी रिकामे करावे. पुन्हा सर्व सदर टाक्या स्वच्छ केल्या जातील असे या गावच्या ग्रामसेविका प्राची राजेशिर्के यांनी सांगितले.
“नागरिकांनी घाबरून न जाता सदर पाण्याच्या टाकी स्वच्छ करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असून उद्या आरोग्य विभागाकडुन लोकांची तपासणी करण्यात येईल. पाण्याचे नमुने पुढे पाठवण्यात येतील असे यावेळी गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे यांनी सांगितले.”
तालुक्यातील अनेक गावांच्या पाण्याच्या टाक्या या डोंगरावर आहेत सदर टाक्यांच्या आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात झाडे झुडपे, काटेरी वनस्पती, गवत आहे सदर पाण्याच्या टाक्या या संबंधित असणाऱ्या गावातील प्रशासनाने पूर्णपणे स्वच्छ कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.