कापूरव्होळ : भोर तालुक्यातील धांगवडी गावात मंगळवारी (दि. २४ जून) रात्री घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे. अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी गावाच्या हद्दीतील एका शेतात रासायनिक मिश्रण असलेला टँकर ओतल्याचं समोर आलं असून, त्यामुळे शेतीसह पाण्याचे स्रोत प्रदूषित होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
बुधवारी सकाळी ८ वाजता ग्रामस्थ सचिन विश्वनाथ तनपुरे यांनी गावचे सरपंच सचिन तुळशीराम तनपुरे यांना फोन करून शेतातून विचित्र वास येत असल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर मातीवर लालसर थर, झाडांची सुकलेली पाने व मातीचे बदललेले स्वरूप आढळून आले. त्यावरून रासायनिक द्रव्य शेतात टाकल्याचा अंदाज पक्का झाला.
या घटनेमुळे संबंधित शेतातील पाणी पूर्णतः दूषित झालं असून, परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे हे पाणी ओढ्यातून पुढे वाहत जाऊन नदीत मिसळतं. या ओढ्यालगत गावाच्या पिण्याच्या पाण्याची विहीरदेखील आहे. त्यामुळे संपूर्ण गावात आरोग्यधोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधला. उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून दूषित माती व पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. केमिकलचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पर्यावरण तज्ज्ञांनी याला परिसंस्थेसाठी गंभीर धोका मानला आहे. जलसंपत्ती, जीवसृष्टी आणि मानवी आरोग्यावर याचे परिणाम होऊ शकतात. गावकऱ्यांनी दोषींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, तसेच विहीर आणि ओढ्याच्या तातडीच्या स्वच्छतेची मागणी प्रशासनाकडे केली आहे.