भोर (जि. पुणे) | प्रतिनिधी : भोर एस.टी. आगाराला नव्याने प्राप्त झालेल्या पाच एस.टी. बसगाड्यांच्या लोकार्पण सोहळ्याचे शुक्रवारी (दि. ६ जून) राजकीय मंच बनलेले दिसून आले. एकाच विषयावर दोन वेळा दोन पक्षांनी वेगवेगळे कार्यक्रम घेतल्याने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच श्रेयवाद उफाळून आला. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले असून, आगामी राजकीय समीकरणांची झलकही यावेळी दिसून आली.
या नव्या पाच बसगाड्यांचे अधिकृत लोकार्पण सकाळी ८ वाजता माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह थोपटे यांनी ‘या बसेस मिळविण्यासाठी आमच्या प्रयत्नांना यश आले,’ असा दावा करत लोकार्पण सोहळा पार पाडला. त्यांनी या गाड्या भोरकर जनतेसाठी समर्पित करत ‘भाजप सरकारच्या प्रयत्नांनी हा लाभ मिळाला,’ असे सांगितले.
मात्र काही तासांतच, सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी हाच लोकार्पण सोहळा नव्याने आयोजून राजकीय वातावरण तापवले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी जि.प. सदस्य चंद्रकांत बाठे, माजी नगरसेवक केदार देशपांडे, तसेच प्रवीण जगदाळे (सरपंच, भोलावडे) आदींसह मोठा कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमात आमदार मांडेकर यांनी एसटी आगार ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत कर्मचाऱ्यांसह बसने प्रवासही केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “या पाच बसेस मंजुरीसाठी मी आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने सातत्याने पाठपुरावा केला. माजी आमदार संग्राम थोपटे यांचा या मंजुरीशी प्रत्यक्ष काहीही संबंध नाही. ते युती सरकारमध्ये निवडणुकीनंतर सामील झाले. प्रस्ताव जुना असला तरी मंजुरी आणि अंमलबजावणी आमच्याच प्रयत्नातून झाली आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “या आगाराला आणखी पाच नव्या बसगाड्या लवकरच मिळणार आहेत, तर पुणे एसटी आगारासाठी पाच इलेक्ट्रिक बसही मंजूर झाल्या आहेत. भोर शहर आणि तालुक्याच्या वैभवात भर घालण्यासाठी दर्जेदार सेवा देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत भोरचे जुने वैभव पुनःप्राप्त करण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे.”
या सगळ्या घडामोडींमुळे भोरमधील राजकीय वातावरणात उधाण आले असून, दोन प्रमुख पक्षांमध्ये ‘कोणाचा खरा वाटा?’ या मुद्द्यावरून उघड राजकीय संघर्ष समोर आला आहे. लोकप्रतिनिधींनी एकाच सुविधेचे दोनदा उद्घाटन करणे ही बाब जनतेच्या चर्चेचा विषय ठरली असून, एसटी प्रशासनही या वादामुळे कोंडीत सापडल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणातून स्पष्ट होते की, आगामी काळात भोरमधील राजकारण अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. लोककल्याणासाठी होणाऱ्या कामांवर राजकीय श्रेय घेण्यासाठी होणारी स्पर्धा कितपत जनहिताची ठरते, हा खरा प्रश्न आहे.