नसरापूर : जेजुरी-मोऱगाव रस्त्यावर बुधवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा आणि भोर तालुक्यातील कांजळे येथील युवकाचा देखील समावेश आहे.
किरलोस्कर कंपनीसमोरील श्रीराम हॉटेलजवळ पिकअप टेम्पोमधून साहित्य उतरवले जात असताना जेजुरीकडून इंदापूरकडे वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कारने पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील प्रवासी, पिकअपवर साहित्य उतरवणारे कामगार आणि हॉटेलमालक असे आठ जण जागीच ठार झाले.सोमनाथ रामचंद्र वायसे (21), रामू संजीवन यादव, दोघेही (रा नाझरे क. प, ता. पुरंदर), अजयकुमार चव्हाण (रा. उत्तर प्रदेश), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवारबाडी, ता. इंदापूर), अश्विनी संतोष येसार, (रा. नागणसूर, हैद्रे सोलापूर), अक्षय शंकर राऊत (रा. झारगडवाडी, ता. बारामती), अशी अपघातील मृतांची नावे आहेत. यात एकाची अद्याप ओळख पटली नाही. सचिन बाजीराव तांबट (रा. कांजळे, ता. भोर), सोनाली किरण राऊत (रा. उद्धट, ता. इंदापूर), माही किरण राऊत (रा. उद्धट, ता. इंदापूर), सार्थक किरण राऊत (रा. उद्धट, ता. इंदापूर), अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने अक्षरशः चक्काचूर झाली. घटनास्थळी रक्ताची शिंतोडे आणि वाहनांचे तुकडे विखुरलेले दिसून आले.
या घटनेत दोन लहान मुले, एक महिला व दोन पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी अतीवेग व निष्काळजीपणा यामुळेच दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.