नसरापूर : “उद्योग टिकले तरच या भागातील स्थानिक नागरिक आणि कामगार वर्गाचे जीवनमान उंचावेल. त्यामुळे उद्योजक व व्यावसायिकांच्या अडचणींवर तातडीने लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी वरवे (ता. भोर) येथे दिले.
पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक आणि व्यावसायिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राचे आयोजन चंद्रकांत बाठे व अमोल बबन पांगारे यांनी केले होते. अध्यक्षस्थानी आमदार मांडेकर होते.
या वेळी भोरचे प्रांताधिकारी डॉ. विजय खरात, तहसिलदार राजेंद्र नजन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल पांगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, ज्ञानेश्वर पांगारे, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, उद्योजक आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
चर्चासत्रात उद्योजकांनी आपल्या समस्या थेट आमदारांसमोर मांडल्या. त्यामध्ये प्रमुख समस्या म्हणून औद्योगिक पट्ट्यातील अंतर्गत रस्त्यांची खराब अवस्था अधोरेखित करण्यात आली. “काही कंपन्यांचा व्यवहार आंतरराष्ट्रीय पातळीवर होतो, मात्र त्या कंपनीकडे जाणारे रस्ते पूर्णपणे मोडकळीस आले आहेत. परिणामी वाहनांची सतत हानी होत आहे, वाहतूक रखडते आणि उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात,” अशी तक्रार अनेक उद्योजकांनी केली.
तसेच, अपुऱ्या वीजपुरवठ्याचा मुद्दाही चर्चेत आला. वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे उत्पादन थांबते, मशिनरीला धोका निर्माण होतो आणि कर्मचारी वर्गाची कामाची सातत्यता बिघडते, असे उद्योजकांनी स्पष्ट केले. वेळू परिसरातील सेवा रस्त्यांची दुरवस्था हा आणखी एक गंभीर प्रश्न यावेळी मांडण्यात आला.
या सर्व समस्यांवर उत्तर देताना आमदार मांडेकर म्हणाले, “उद्योजक व व्यावसायिक हे स्थानिक रोजगार निर्मितीचे मुख्य स्त्रोत आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी लक्षपूर्वक ऐकून घेणे आणि त्या सोडवणे ही आपली जबाबदारी आहे. रस्ते, वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा सक्षम असतील तरच उद्योग फोफावू शकतात.”
“या भागातील उद्योग व स्थानिक विकास हातात हात घालून चालतो. त्यामुळे सर्व स्तरांवरील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे काम केल्यास येथील औद्योगिक आणि सामाजिक विकास गती घेईल. मी स्वतः या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करून शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.
चर्चासत्रात सहभागी झालेल्या उद्योजक व ग्रामस्थांनी आमदार मांडेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले व पुढील काळातही त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. अशा चर्चासत्रांद्वारे प्रशासन व स्थानिक उद्योगधंद्यांमध्ये समन्वय वाढून समस्या सोडवण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मत सहभागी उद्योजकांनी व्यक्त केले.